🌍 भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन
भारताचा व्यापार आणि सांस्कृतिक इतिहास प्राचीन काळापासून परदेशी व्यापाऱ्यांनी समृद्ध केला आहे. मात्र, 15 व्या शतकानंतर युरोपियन कंपन्यांच्या आगमनाने भारतीय इतिहासात नवा अध्याय सुरू झाला. या कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापार असला तरी, पुढे त्यांनी भारतावर राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित केले.
⚓ पोर्तुगीजांचा भारतात आगमन
15 मे 1498 रोजी वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज खलाशी कालिकत येथे पोहोचला. त्याचे स्वागत झमोरिन राजाने केले. यामुळे भारताकडे जाणाऱ्या समुद्री मार्गाचा शोध लागला, ज्याचे श्रेय पोर्तुगीजांना जाते.
युरोपीय लोकांच्या भारतात येण्याचा मुख्य उद्देश व्यापार होता. 1505 मध्ये फ्रान्सिस्को डी आल्मेडा हा भारतातील पहिला गव्हर्नर बनला. फ्रान्सिस्को डी अल्मेडा याला हिंदी महासागरातील व्यापारावर पोर्तुगीज नियंत्रण प्रस्थापित करायचे होते परंतु तो त्यात अयशस्वी झाला आणि 1509 मध्ये तो पोर्तुगालला परतला.
फ्रान्सिस्को डी आल्मेडा नंतर, अल्फोन्सो डी अल्बुकर्क याला पुढील पोर्तुगीज गव्हर्नर बनवले गेले आणि 1509 मध्ये भारतात पाठवले गेले. अल्फोन्सो डी अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक मानला जातो. त्यांनी गोवा आणि होर्मुझ बेट जिंकले तसेच पोर्तुगीजांना भारतीयांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले.1510 मध्ये, पोर्तुगीजांनी विजापूरकडून गोवा हिसकावून घेतला, तेव्हा विजापूरचा तत्कालीन शासक युसूफ आदिल शाह होता.
1560 मध्ये, मार्टिन अल्फोन्सो डी सूझा याला गव्हर्नर म्हणून पाठवण्यात आले, त्याच्यासोबत ख्रिश्चन संत फ्रान्सिस्को झेवियर देखील भारतात आला , ज्यानी गोव्यातील स्थानिक जमाती आणि मच्छिमारांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रेरित केले.
पोर्तुगीजांनी त्यांचे सागरी साम्राज्य ‘इस्तादो-दा-इंडिया’ म्हणून ओळखले. त्यांनी जहाजांवर ‘कार्टाज’ नावाचा कर लावला, जो अकबरलाही भरावा लागत होता!
- भारताचा पहिला छापखाना (1556) गोव्यात सुरू झाला.
- पहिला कारखाना हुगळी येथे स्थापन झाला.
- लाल मिरची, काळी मिरी आणि तंबाखू यांची लागवड पोर्तुगीजांनी केली.
धार्मिक असहिष्णुता आणि डच स्पर्धेमुळे 17व्या शतकात पोर्तुगीज सत्तेचा ऱ्हास झाला.
डच (हॉलंड)
1596 मध्ये डच व्यापारी भारतात आले आणि 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. भारतासोबत व्यापार करण्यासाठी संयुक्त भांडवली कंपनी स्थापन करणारे डच लोक पहिले होते. डच लोकांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि कोचीमध्ये फोर्ट विल्यम्स बांधले. त्यांनी चिनसुरा, मासुलीपट्टणम, पुलिकट व कोची येथे व्यापारी केंद्रे उघडली.
त्यांचा व्यापार मसाले, अफू, रेशीम आणि कापूस यावर आधारित होता. पण 1759 च्या बेद्रा लढाईत ब्रिटिशांकडून पराभव झाल्यानंतर भारतातील त्यांचा प्रभाव संपला.
इंग्रज (ब्रिटिश)
भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणारे युरोपियन म्हणजे ब्रिटिश. 1599 मध्ये जॉन मिल्डेनहॉल हा पहिला इंग्रज भारतात आला, आणि 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथ पहिली हिने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची परवानगी दिली.
लेव्हंट कंपनीला जमीन मार्ग आणि ईस्ट इंडिया कंपनीला सागरी मार्ग देण्यात आला. 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स जहांगीरच्या दरबारात आला. भारतामध्ये व्यापार वाढवण्यासाठी कॅप्टन हॉकिन्सने सुरतमध्ये स्थायिक होण्याची विनंती केली आणि जहांगीरला भेटवस्तू दिल्या. जहांगीरने त्याला "इंग्रजी खान" ही पदवी बहाल केली, पण पोर्तुगीजांच्या विरोधामुळे परवानगी मिळाली नाही. नंतर 1611 मध्ये कॅप्टन मिडलटनने पोर्तुगीजांचा पराभव केला, आणि 1613 मध्ये ब्रिटिशांना सुरतमध्ये पहिला कायमस्वरूपी कारखाना स्थापण्याची परवानगी मिळाली. पुढे त्यांनी मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता येथे केंद्रे उघडली.
1757 च्या प्लासीच्या लढाईत (रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सिराज-उद-दौला) आणि 1764 च्या बक्सरच्या लढाईत (हेक्टर मुनरो) ब्रिटिशांनी निर्णायक विजय मिळवला.
भारतात ऊस, अफू, चहा, कॉफी, ज्यूट इत्यादींची लागवड करणे आणि ते स्वस्त दरात विकत घेऊन इंग्लंडला पाठवणे आणि ब्रिटनमधून आयात केलेले महागडे कापड भारतात विकणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते. ब्रिटिशांनी भारतातील प्रमुख भागात रेल्वे रुळ टाकले आणि रस्ते बांधले. मात्र त्यांचा हेतू होता — भारताचा शोषण आणि इंग्लंडचा विकास! त्यांनी जवळपास 200 वर्षे (1757–1947) भारतावर राज्य केले.
फ्रेंच
1664 मध्ये लुई चौदावाच्या कारकिर्दीत कोलबर्टने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. 1668 मध्ये औरंगजेबाच्या परवानगीने सुरतमध्ये कारखाना आणि 1669 मध्ये, गोलकोंड्याच्या सुलतानाची परवानगी घेतल्यानंतर फ्रेंचांनी मासुलीपटणम येथे त्यांचा दुसरा कारखाना स्थापन केला. 1673 मध्ये बालिकोंडापुरमच्या गव्हर्नरकडून एक छोटेसे गाव मिळवून फ्रान्सिस मार्टिनने पाँडिचेरीचा पाया घातला.
गव्हर्नर डुप्लेक्स यांनी भारतीय राज्यांवर सत्ता वाढवली, परंतु कर्नाटक युद्धांमध्ये (1746–1763) ब्रिटिशांकडून पराभूत झाले.
⚔️ निष्कर्ष
सर्व युरोपीय कंपन्या व्यापारासाठी भारतात आल्या, पण लोभ आणि सत्तेच्या लालसेने त्यांना राजकारणात ओढले. त्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतींमध्ये शेवटी ब्रिटिशांचे धोरण आणि कार्यकुशलता सर्वांपेक्षा प्रभावी ठरली, आणि त्यांनीच भारतावर दीर्घकाळ राज्य केले.

0 टिप्पण्या